शिवसेनेचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे त्यांचे गाव. ते शिक्षणासाठी ठाण्यात आले होते. गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. पण त्यातून मिळकत होत नव्हती. म्हणून शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. याचवेळी ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18 वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला. शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभाग घेतला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्ला. मितभाषी, संयमी, पण आंदोलनात आक्रमक असलेल्या एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंची कृपा झाली आणि शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले.
शिवसेनेच्या प्रत्येक आंदोलनात फ्रंटवर असलेल्या एकनाथ शिंदेंना 1997 हे वर्ष अत्यंत लकी ठरलं. 1997मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत.
नम्र, मितभाषी, कडवट शिवसैनिक, जोडतोडीच्या राजकारणाचं कौशल्य या एकनाथ शिंदेंच्या जमेच्या बाजू आहेत. 2014 च्या मोदी लाटेतही शिंदेंनी ठाण्यात शिवसेनेची पडझड होऊ दिली नाही. कार्यकर्त्यांचं गाऱ्हाणं ऐकून घेण्याची क्षमता आणि ‘मास बेस’ असलेला नेता म्हणून शिंदेची ओळख आहे. आनंदराव दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना टिकवण्यामागे शिंदेंचं योगदान मोठं आहे. ठाणे पालिका, जिल्हापरिषदा, अंबरनाथ नगरपरिषद, कल्याण-डोंबिवली पालिका, बदलापूर नगरपरिषदेपासून ते नाशिकपर्यंत शिंदे यांनी शिवसेनेचं जाळं विणलं आहे. ठाण्यापासून नाशिकपर्यंत शिंदेंचा शब्द प्रमाण मानला जातो.
एकनाथ शिंदे यांना गरीबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. केवळ इयत्ता दहावीपर्यंतच ते शिकले. त्याचं शल्य त्यांना नेहमीच बोचत होतं. त्यामुळे त्यांनी वयाच्या 56 व्या वर्षी पदवी परीक्षा पास होऊन शिक्षणाला वयाची अट नसते हे दाखवून दिले आहे. शिंदे यांनी पदवी परीक्षेत 77.25 टक्के गुण घेऊन घवघवीत यश मिळविले आहे. ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयातून त्यांनी पदवी परीक्षा दिली आहे. वयाच्या 56व्या वर्षी पदवीधर होणारे ते राज्यातील बहुदा पहिलेच मंत्री असण्याची शक्यता आहे. अर्धवट शिक्षण पूर्ण करून त्यांनी एक प्रकारचं अपूर्ण रिंगण पूर्ण केलं आहे. त्यांचं शिक्षण कमी झालं असलं तरी त्यांनी त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर बनवलं. श्रीकांत हे कल्याण विधानसभा मतदारसंघातील खासदारही आहेत.
.